भाऊंच्या गाडीतून आम्ही परत आमच्या गावी सुखरूप पोचलो.
भाऊंच्या यशस्वी भेटीची बातमी ऐकून आमचे मित्रमंडळ अत्यंत खूष झाले.
पाच नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवाजी मैदानावर आस-पारा संयुक्त विद्यमाने डर्टट्रॅक मोटरसायकलिंग स्पर्धा झाल्या.
भाऊंच्या शब्दाप्रमाणे मुंबईचे - पुण्याचे तीस - चाळीस स्पर्धक स्वखर्चाने स्पर्धेला आले.
स्पर्धेच्या वेळेत गावात जणू कर्फ्यू लागला होता. सारं गावच मैदानावर स्पर्धा पाहण्यासाठी जमा झालं होतं. कोडोलीकर सरकार - आण्णा कलावंतही आले होते.
हजारो लोकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्यांनी मैदान दणाणून सोडले. अनेक पटके, टोप्या हवेत उडवल्या गेल्या.
संजय बारकुटे, विजय बारकुटे, निव्या, विष्णू, बालमुकुंद, देवू , श्रीनिवास पाडळे, उत्तम पाटील, विकास पाटील, सुदर्शन माळी, निशिकांत मुक्कणावर, किरण परचुरे, हेमंत सावंत, अजय जोशी, संजय कणकवलीकर - सगळी मंडळी कृतकृत्य झाली.
श्रीकांत गोगटे प्रमुख निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी आमच्या प्रयत्नांची वाखाणणी केली. पुढच्या वर्षी कोडोलीच्या माळावर मोटोक्रॉस स्पर्धा घेण्याचं जाहीर करून टाकलं.
इंदिरा गांधी सहकारी साखर कारखान्यानं आमच्या क्लबला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
दुसऱ्या दिवशी दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातल्या वर्तमान पत्रांमध्ये स्पर्धेचे वृत्तांत छापून आले. राजाचा फोटोही आला होता. कुठेकुठे माझाही उल्लेख होता.
पण मकरंद साठे या नावाचा उल्लेख कुठेच नव्हता आणि तो कधीही होणार नाही याची मला खात्री होती. मकरंद साठेचं पुढं काय झालं हे मला माहित नाही. माझं पुढं काय झालं ते त्यालाही माहीत नाही. प्रत्येक दिवाळीत मला तो हमखास आठवतो. तुम्हाला भेटला तर तुम्ही सांगा त्याला - मी आठवण काढत होतो म्हणून...
या दिवाळीत पुण्याला गेलो तर त्याला भेटीन म्हणतो... लक्ष्मीपूजनादिवशी - तो सुंदरनगरातच असेल आणि सुंदरनगर तिथेच असेल तर!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment